Monday, May 2, 2011

women's day Article on Mayuri Apte

" प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे" अशी एक म्हण आहे, आणि असेच अथक प्रयत्न करून जिद्दीने आपल्या पायांवर यशस्वीपणे उभी राहून दाखवणार्‍या मयुरी आपटे या मूक-बधिर, पेंढारकर महाविद्यालयात "बी.एस्स.सी"च्या तृतीय,वर्षाला शिकणार्‍या तरुणीचा परवा भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते "अलौकिक प्रतिभा" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

डोंबिवलीत लहानाची मोठी झालेल्या मयुरीला लहानपणापासूनच ऐकू येत नव्हते, पण तरीही तिच्या पालकांनी तिच्या बालपणीच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या बागुल मॅडम यांच्या सल्ल्याने इतर मुलांसारखीच वागणूक दिली, आणि तिला एखाद्या विशेष शाळेत न घालता "स्वामी विवेकानंद, दत्तनगर" इथल्या (नॉर्मल) मुलांच्या शाळेतच तिने १०वी पर्यंत यशस्वीपणे शिक्षण पूर्ण केलं. तिच्या या प्रवासाबद्दल तिची आई माधुरी आपटे सांगत असतात, 'मयुरीचा हा आमच्या आणि तिच्या आणि आमच्यासाठीही सोपा नव्हता. ती दीड वर्षांची असताना आम्हाला तिच्या आजाराबद्दल लक्षात आलं, हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकिंग केल्यावर कळलं की ऐकू येण्याच्या काही नसा दाबल्या गेल्या आहेत, आणि त्यावर काही कायमस्वरुपी इलाज नसल्याने 'श्रवणयंत्राच्या' सहाय्याने तिने पुढे वाटचाल सुरु ठेवली. तस बघायला गेलं तर शाळांमधे अशा मुलांसाठी बर्‍याच सवलती असतात, त्यांना रेग्युलर (भाषा)लँग्वेजेस शिकणं कठीण पडतं म्हणून चित्रकला, टायपिंग असे तुलनेने अनेक सोपे विषय अभ्यासाला मिळतात. पण आम्ही तिला नॉर्मल मुलांच्या शाळेत घालतानाच ठरवलं होतं की कोणतही कन्सेशन न घेता रेग्युलर शिक्षण पूर्ण करायचं. आणि त्याप्रमाणेच तिने बरीच मेहनत घेऊन, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींच्या मदतीने अभ्यास करून १०वीला७४% मिळवले.

पण त्यानंतरचा प्रवास थोडा जास्त खडतर होता, मयुरी हातवारे करत, थोडफार बोलायचा प्रयत्न करत सांगत असते. ' पेंढारकर कॉलेजमध्ये सायन्सला अ‍ॅडमिशन घेतली खरी, पण पहिले ३-४ महिने खूप कठीण होते. नवीन अभ्यासक्रम, शिक्षक, विद्यार्थी सगळेच नवीन, कोणीच मित्र-मैत्रीणी नाहीत, कोणालाच माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. . आणि तेव्हा एका विषयासाठी ३-४ वेगवेगळे शिक्षक होते. त्यामुळे पहिले काही दिवस आई रोज माझ्याबरोबर कॉलेजला यायची, माझ्या शिक्षकांना , वर्गातल्या इतर मुलांना भे टून ओळख करून द्यायची, अस करत करत मग मी हळूहळू तिथे सेटल होत गेले . आणि गेल्या पाच वर्षात मला एकदाही एकटं वाटल नाही, सगळ्या शिक्षकांनी, माझ्या मित्र-मैत्रिणींनी खूप सांभाळून घेतलं, लेक्चरमध्ये, अभ्यासात खूप मदत केली. कॉलेजमध्येपण आम्ही सगळ्या स्पर्धांमध्ये, फेस्टीव्हल्समध्ये ,मध्ये खूप धमाल केली, आणि ही ५ वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही.

अभ्यासाबरोबरच मयुरीला वाचनाचीही खूप आवड आहे. वेगवेगळ्या लेखकांची आत्मचरित्र वाचणं तिला जास्त आवडतं. 'एक होता कार्व्हर', ' इडली, ऑर्किड आणि मी', ' अग्निपंख' ही तिची विशेष आवडती पुस्तकं . या २-३ पुस्तकांची तर मी अक्षरशः पारायण केली आहेत. माणसाने किती प्रयत्नशील असावं, परिस्थितीवर मात करून कस पुढे जायचं, यशस्वी व्हावं, हेच या पुस्तकांनी मला शिकवलं.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांकडून पुरस्कार मिळणार आहे हे जेव्हा तिला कळलं , तेव्हा खर तर ती थोडी घाबरलीच, नर्व्हस झाली. मला का हा पुरस्कार मिळतोय? मी अस काय मोठ यश मिळवलय, जे काही केलं ते तुम्हीच ( आई-वडिलां नी) केलेल्या प्रयत्नांमुळे आहे. पण नंतर मी तिला कारण सांगितल की, '२०११ हे वर्ष "ईयर ऑफ केमिस्ट्री" म्हणून घोषित करण्यात आलयं. त्यामुळे हा पुरस्कार देण्यासाठी 'केमिस्ट्री'मध्ये यश मिळवलेल्या एका यशस्वी तरुणीचा ३ महिने शोध घेऊन 'आरोहण' संस्थेने ह्या पुरस्कारासाठी तुझी निवड केली आहे. ह्या सत्कारामुळे तुझ्यासारख्या अनेक मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणा मिळेल, तेही त्यां च्या पायांवर स्वतंत्रपणे उभे राहून एक यशस्वी जीवन जगू शकतील. हे सांगून आई-बाबांनी मला हेही बजावल की ' हा पुरस्कार तुझ्या मेहनतीच बक्षीस आहे, पण म्हणून हुरळून न जाता, पाय जमिनीवरच ठेऊन पुढच लक्ष्य गाठ आणि यशस्वीपणे पुढे जात रहा.'

तिच्या या जिद्दीला आमचा सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!!

No comments:

Post a Comment